संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
स्व. शामराव रामचंद्र पाटील (मामा) त्यांचा जन्म 1912 साली चावरे (ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर.) येथे झाला. त्यांचे शिक्षण जिल्हा परीषद शाळा, कामेरी येथे झाले.
कामेरी गावात खरंतर त्यांना पहिल्यापासून 'बापू' म्हणत. मा.ना. जयंतराव पाटील (साहेब) व तर त्यांचे भाचे माजी आमदार कै. विलासराव शिंदे (साहेब) त्यांना 'मामा' या नावानेच बोलवायचे. त्यामुळे जिल्ह्य़ातील सर्वच नेते आणि कार्यकर्ते त्यांना 'मामा' या नावाने बोलवू लागली. त्यामुळे गावाच्या बाहेर 'बापू' या शब्दावर 'मामा' या शब्दाने मात केली आणि जिल्ह्य़ात 'मामा' म्हणून ते प्रसिद्ध झाले.
बापूंच्या भोवती त्यांच्या वाड-वडिलांच्या पासून मोठेपणाचं वलय प्राप्त झालं होतं. बापूंचे उर्फ मामांचे व्यक्तीमत्वच भारदस्त होते. झुपकेदार मिश्या, अंगावरची पांढरी शुभ्र खादी कपडे त्यांच्या भारदस्तपणात भरच घालीत असत. त्यांचा रुबाब एखाद्या मंत्र्यांसारखा दिसायचा.
ते एक उत्तम शेतकरी होते. त्यांची शेती आदर्श होती. पन्नासहून अधिक दुधाळ जनावरे व रूबाबदार, ऐटबाज बैलजोड्या त्यांच्या पाटीलकीची शोभा वाढवीत होते. त्यांचा स्वभाव फार विनोदी होता. बापू रस्त्याने चालत निघाले की गावातील लहान मुलं त्यांच्याकडे धावत यायची व 'शेकहँड' करून जायची. पोरांना त्यात आनंद वाटायचा.
त्यांच्या शेतात असणाऱ्या 20-25 सालकरी गड्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत. कुंटुंबातील व्यक्ती समजून त्याची देखभाल ते करत होते.
लोकनेते राजारामबापू पाटील यांचे निकटचे नातेवाईक व विश्वासू, निष्ठावान कार्यकर्ते म्हणून बापूंना ओळखले जात होते. 'निष्ठा' या शब्दाला समानार्थी शब्द शोधायचा असेल तर 'शामरावमामां'नाच म्हणजे 'बापूंना'च नजरे समोर आणावे.
सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याचे संचालक, शेतकरी विणकरी सूतगिरण संचालक, तसेच कामेरी येडेनिपाणी सह. पाणी पुरवठा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून विविध पदावरती त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे.
पाणी पुरवठा संस्थेमुळे कामेरी व येडेनिपाणी या दोन्ही गावात हरित क्रांती झाली. राजारामबापू उद्योग समूह उभारणीत स्व. राजारामबापूं पाटील यांना मोलाची साथ दिली.
बापूंच्या बाबतीत गावातील सर्व अबाल वृध्द लोकांचा बघण्याचा दृष्टीकोण अगदी स्वच्छ, निर्मल आणि प्रेमळ व्यक्ती म्हणून होता. त्यांच्याकडून उभ्या आयुष्यात दुजाभाव तर झाला नाहीच उलट गोरगरिबांना नेहमी न्याय देण्याची त्यांची भूमिका असायची. प्रत्येकाच्या सुखदुःखात प्रत्यक्ष हजर राहुन लोकांना आधार देण्याचे काम ते करीत राहीले.
बापूंना ऐतिहासिक कांदब-या फार आवडत. मराठीतल्या सर्व प्रसिद्ध ऐतिहासिक कादंब-या त्यांनी वाचल्या होत्या. तर सिनेअभिनेते विलास रकटे (बापू) हे शामरावमामांचे उर्फ बापूंचे मानसपुत्र.... त्यांच्या अनेक मराठी चित्रपट निर्मितीसाठी बापूंनी सहकार्य केले. त्यांना कला संस्कृतीची आवड होती. स्वतःचा वाडा अनेक मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्यांनी मोठ्या मनाने उपलब्ध केला होता. वेळ प्रसंगी चित्रपटातील काही छोट्या भूमिकेसाठी स्वतः हजर राहिले. ते इतरांच्याही कलागुणांचा नेहमी आदर करायचे.
तर गोरगरिबांना वेळोवेळी आर्थिक मदत केलीच परंतु धनधान्य विना मोबदला देण्याचे काम नेहमीच केले. अबाल वृध्द लोकांना कधीही कटु शब्द न वापरता आदराची वागणूक त्यांनी नेहमी दिली.
तर कामेरीच्या श्री भैरवनाथ यात्रेत ते हिरीरीने भाग घेत. यात्रा तुफान भरे, बगाड (बैलांनी ओढायचा एक अवाढव्य गाडा) जोरात चाले. काही वेळा बगाडावर माणसांची खूपच गर्दी होई. कोणीतरी पडून चाकाखाली सापडेल म्हणून बापू काळजी घ्यायचे.
लोकनेते राजारामबापू पाटील व त्यानंतर त्यांचे चिरंजीव नामदार जयंतरावजी पाटील (साहेब) यांना आयुष्यभर साथ देण्यात ते कधीच कमी पडले नाहीत. बापूंच्या पश्चातही त्यांचे संपूर्ण घराणे त्यांचा वारसा जपत पाटील साहेब यांच्या पाठिशी उभे आहेत. समाजात ते कधीही लोकांना परके वाटले नाहीत, परके म्हणून वागले नाहीत आणि त्यांच्या पुढील पिढीलाही चुकिची शिकवण देऊन गेले नाहीत. शामरावमामा पाटील (बापू) हे स्वर्गवासी झाले तरी त्यांची आठवण म्हणून प्रत्येक जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करुन मामांना आदरांजली वाहिली जाते.
Ø घटनाक्रम -
Ø भुषविले पदे -
बापूंचे मोठेपण एवढ्या छोट्याशा लेखात चित्रीत करणं कठीण आहे.
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.